Friday, 11 April 2014

प्रेम व्यक्त करताना ११

"वाईट वाटते म्हणे..!! माणूस आहेस ना तू..?? वाईट वाटणारच पण कित पर्यंत या गोष्टीचा विचार करून स्वत:ला बरबाद करायचे ते तुला ठरवायचे आहे...

तू मला कधीही सांगितले नसले तरीही, आई आहे मी तुझी, तुझ्या डोक्यात काय चाललंय हे एखाद्या वेळी मला कळणार नाही पण तुझ्या मनात चाललेली घालमेल मला कधीच समजली होती. तुझ्यात झालेले बदल कळण्या एवढी तरी मी तुझ्याशी जुळली आहे..”

“बघ मनू..!! तुझ्या अगदी मनासारखा हवा तो जॉब मिळाल्यावरही तू चक्क पुण्याला जावे लागते म्हणून नाकारले तेव्हाच मला कळाले होते कि काही तरी बिनसलंय, काही तरी पुण्यात टाळते आहेस तू, नाही तर हव ते मिळूनही घरी बसणाऱ्या पैकी तू नाहीस.. का नाही करायचा जॉब या प्रश्नाला किती पोकळ उत्तर दिलं होतास तेव्हा, कि मला घरी राहायचं आहे,बाहेर बाहेर राहून कंटाळा आला, बाकी लोकांनी ठेवलाही विश्वास पण मी कसा ठेवू सांग.?? कारण घरात जीव गुदमरतो तुझा, हे मला माहित आहे..!!”

“दिवाळी सारखा सण असूनही कोण तो पोरगा त्याचा एक call नाही आला म्हणून तू इतकी उदास झालीस.. घरी चाललेली तयारी, इतक्या वर्षानंतर तू दिवाळी साठी घरी आहे हे सर्व तुला काहीच महत्वाच नाही..?? असा रडवेला चेहरा करून घरचे वातावरण बदलवताना मी तुला या आधी कधीच पहिले नाही.. उलट तू घरी आलीस कि उत्साह असायचा नेहमी, कुठे गेली ती माझी मुलगी..??”

  “कुणी आवडल्यानी इतका फरक पडतो..?? कुणाच्या प्रेमात पडल्यानी खरच तू स्वत:ला ही विसरलीस का..? पुण्यात गेल्यावर तो आठवतो म्हणून घरी बसने हे कितपत योग्य आहे..?? सर्व मैत्रिणी सोबत उनाडक्या करत फिरणारी तू त्यांचे call दुर्लक्षित कशी करू शकते..??
तु मला त्याच्या बद्दल बऱ्याच उशिरा सांगितलस याच काहीही वाटत नाही आहे मला.. पण तुझी कवडीचीही काळजी न करणाऱ्या त्याच्या मुळे तू स्वत:ला बदलवण आणि घरात स्वत:ला कोंडून ठेवण या सर्वांमुळे मला जास्त वाईट वाटत आहे..!!”

“आणि माझा कुणावर प्रेम करण या गोष्टीला विरोध नाही, पण तुला जो आवडला तो तुला तू आहे तशी स्वीकारायला तयार आहे का..?? नाही ना..?? तो तरी तुला आहे तसा चालेल का...??”

“मला उत्तर देण्यापेक्षा तू स्वत:लाच उत्तर दे..!!”
“आणि खरच सांगू तो तुला आवडतो ना, यात काहीही चूक नाही आहे उलटं तुझ्यात संवेदना जिवंत आहे हे सिद्ध झालंय, मी तुला तुझ्या एका मित्राच्या मृत्युनंतर कोसळताना पाहिलंय. पण तेव्हा तू दोन दिवसात  सावरली होतीस, तेव्हा कुठून बळ मिळवून कठोर झाली होतीस, तशीच हो न एकदा पुन्हा..!”

“मी तुला त्याच्याशी बोलूच नको असे म्हणत नाही आहे, फक्त प्रेम ही भावना मनातून बाजूला ठेवून बोल.. आवडतो तो हे विसरून बोल.. जो मित्र तुला हरवल्या सारखा वाटतोय तो सापडतो कि नाही बघ..”

मनुनी सागर आवडतो हे दिवाळीच्या दिवशी आईला न राहवून सांगितलं. घरात इतका कामाचा व्याप पडला असूनही रडणाऱ्या आपल्या बाळाला मांडीवर घेवून आई तिची समजूत काडत होती..!! मनूच्या गालावर ओघळणारा आणि स्वत:च्याही डोळ्यातले अश्रू नेहमी नेहमी पुसत होती..

आईच्या मांडीवर पडून मनू खरतरं सागरचे मनोमनी आभार मानत होती. त्याच्यामुळेच तीन-चार वर्षापासूनची तिची आणि तिच्या आईतली दरी कमी झाली होती.. निर्मळ प्रेमाचा एक खराखुरा अनुभव ती घेत होती..
त्याच्या जायज नकारामुळे ती स्वावलंबी झाली होती..ती स्वत:ला जास्त ओळखायला लागली होती.. ही दिवाळी तिच्या साठी खूप नवीन स्वप्ने घेऊन आली होती..!!



No comments:

Post a Comment